शेतकऱ्याने रानडुकरांना केलं कन्फ्यूज, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, अचानक तोंडाला फेस
शेती

शेतकऱ्याने रानडुकरांना केलं कन्फ्यूज, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, अचानक तोंडाला फेस

अमरावती : शेतकरी आपल्या जीवाचे रान करत शेतात पेरलेले पीक उभे करतो. मात्र, कधी नैसर्गिक तर कधी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा दिसून येतं. मात्र अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांपासून पीक वाचवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.आपलं पीक सही सलामत ठेवल्याने त्या शेतकऱ्याचे अमरावती जिल्ह्यात जोरदार कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या या कन्फ्यूजन थेरी मुळे प्राण्यांचा जीव वाचतो आणि पिकाचे नुकसान देखील होत नाही. मनोज निंभोरकर असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकरी अनेकदा आपल्या पिकाला वन्य प्राण्यांपासून संरक्षित करण्यासाठी शेताच्या भोवती तार फेंसिंग किंवा करंट लावत असल्याचे आपण वाचतो. मात्र, यामुळं मनुष्यासह, वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मात्र, हे सर्व टाळून या शेतकऱ्यानी एक देशी जुगाड करून आपल्या पिकाचे संरक्षण केले असून त्यामुळे एका अर्थाने उत्पन्नातही भर पाडून घेतली आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील शेतकरी मनोज निंभोरकर यांनी आपल्या शेतात दोन वर्षांपासून रानडुकरापासून हरभरा बियाण्याचा बचाव करण्याची नवीन शक्कल लढवली. या शेतकऱ्याने पेरणीपूर्वी आपल्या हरभरा बियाण्यावर अंघोळीला वापरण्यात येणारे शाम्पू लावून ते उन्हात वाळविले. त्यानंतर त्या बियाण्यावर कीड प्रतिबंधक औषधी व रसायने लावून शेतात पेरणी केली. रानडुकरांनी शेतात शिरून बियाणे खाण्याचा प्रयत्न केला असता, शाम्पूमुळे त्यांच्या तोंडात फेस होतो. यामुळे कन्फ्यूज झालेले रानडुकर शेत सोडून पळू लागले. हा यशस्वी प्रयोग त्यांनी गतवर्षी सर्वप्रथम केल्याने त्यांचे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य नुकसान झाले.

यावर्षीसुद्धा त्यांनी हाच प्रयोग आपल्या हरभरा पेरणीच्या वेळी केल्यामुळे अद्याप त्यांच्या हरभरा बियाण्याचे शेतात नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इतर शेतकऱ्यांना मात्र रानडुकरांपासून बियाणे नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्यास शेतात होणाऱ्या हरभरा बियाण्याच्या नुकसानापासून बचाव होऊ शकतो, असा ठाम विश्वास मनोज निंभोरकर यांनी दर्शविला असून त्यांनी शेतकऱ्याना हा वापरण्याचे आवाहन केले आहे.