करोना: राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र बरे होणारे रुग्ण वाढले
कोरोना इम्पॅक्ट

करोना: राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र बरे होणारे रुग्ण वाढले

मुंबई: राज्यात आज मंगळवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसख्येत वाढ झाली असून एकूण सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट झाली आहे. तसेच, आज मृत्युसंख्येतही घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ७६७ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ७ हजार ३९१ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ८४ हजार ३३८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५५ लाख ११ हजार ३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ३५ हजार ६५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ८३ हजार ४२१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ०२५ इतकी आहे.

मुंबईत आज ११२ नवे रुग्ण

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी ११२ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६२ हजार ९८६ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३४० इतकी आहे.

ठाणे जिल्ह्यात आज एकूण १५५ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात आज बुधवारी नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात ३२, ठाणे महापालिका क्षेत्रात ३८, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ४४, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात २२, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ३, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात १६ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज एकूण ८ नवे रुग्ण आढळले असून, वसईविरार मनपा क्षेत्रात १६, रायगडमध्ये ८ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ८ नवे रुग्ण आढळले आहेत.