आमिक्रॉनचे संकट वाढतेय; पण करोनाकडेही दुर्लक्ष नको, पाहा ताजी स्थिती!
कोरोना इम्पॅक्ट

आमिक्रॉनचे संकट वाढतेय; पण करोनाकडेही दुर्लक्ष नको, पाहा ताजी स्थिती!

मुंबई: राज्यात आज रविवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी आजच्या मृत्यूसंख्येत घट पाहायला मिळत आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही आज वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ९०२ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ७ हजार ०६८ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ९७ हजार ५०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ७६ लाख ८४ हजार ६७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ४९ हजार ५९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.८२ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७२ हजार ९८२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ३४८ इतकी आहे.

मुंबईत आज ३२१ नवे रुग्ण

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज रविवारी ३२१ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६७ हजार ०५० इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये २ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३६५ इतकी आहे.

ठाणे जिल्ह्यात आज एकूण १०४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात आज रविवारी १०४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १२, ठाणे महापालिका क्षेत्रात २९, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३८, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात १४, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ५, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ० मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ६ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज ५३ रुग्ण आढळले असून, वसईविरार मनपा क्षेत्रात २१, रायगडमध्ये ८ आणि पनवेल मनपा क्षेत्रात १५ नवे रुग्ण आढळले आहेत.