दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण

मुंबई : दहावी आणि बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा आता ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला असून दहावी बारावीच्या परीक्षांचा शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढलं आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा पुढच्या महिन्यापासून सुरु होणं अपेक्षित आहे. राज्यात दहावीचे 16 लाख तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी आहेत. सध्यातरी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, परीक्षा या ऑफलाईनच झाल्या पाहिजेत, अशी भूमिका शिक्षण विभागानं घेतली आहे.

तसेच, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून त्यानंतरच तारखांसंदर्भातील निर्णय घेतले जातील.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात आढावा घेतला होता. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्याचा पर्याय असू शकतो का? परीक्षा ऑनलाईन घेता येतील का? अशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली, तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे जर परीक्षा घ्यायची असेल तर ती ऑफलाईनच झाली पाहिजे. परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार अशी त्यांनी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिक्षम मंडळाच्या ठरलेल्या कालावधी परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने एप्रिल आणि मे महिन्यात दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केलं आहे. बोर्डाने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.