धक्कादायक! कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू
देश बातमी

धक्कादायक! कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू

बंगळुरु : बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे. त्याचवेळी घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला असून एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊ या प्रकरणाचा तपशील घेतला असून त्याविषयी पुढील तपास सुरू केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती (५४), सिंचना (३४), सिंधुराणी (३१) आणि मधूसागर (२५) अशी मृतांची नावं आहेत. या सगळ्यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा सगळा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. घरातील एक सदस्य बाहेरगावाहून घरी परतले, तेव्हा घर आतून बंद होतं. अनेकदा वाजवूनही कुणीच घर उघडलं नाही तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यावेळे पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना चार जणांचे मृतदेह घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याचवेळी ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अडीच वर्षांची मुलगी या प्रकारात जिवंत वाचली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी भारती या शंकर यांच्या पत्नी आहेत. इतर तिघेजण त्यांची मुलं असून दोघे चिमुरडे त्यांचे नात-नातू आहेत.

दरम्यान, २०१८मध्ये राजधानी दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली होती. यामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, कालांतराने तपासामधून अघोरी कृत्यामध्ये या सगळ्यांचा जीव गेल्याचं स्पष्ट झालं होतं.