उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू
देश बातमी

उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू

लखनौ : रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर वाळूचा ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातामध्ये आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गॅस कटर आणि इतर साहित्याच्या मदतीने गाड्यांचे अवशेष आणि वाळू बाजूला काढून खाली कोणी अडकले आहे का हे तपासण्यात आले. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांमध्ये पुरुष आणि महिलांबरोबरच लहान मुलांचाही समावेश आहे. मरण पावलेले सर्वजण हे स्थानिक रहिवाशी असून हे एका लग्न समारंभावरुन येत होते.

घटनास्थळी पोहचलेले जिल्हाधिकारी अमित सिंह यांनी आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाळूने भरलेला ट्रक थेट गाडीवर कोळसल्याने गाडीतील व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि ते वाळूखाली गाडले गेले. कोखराज पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या शहाजादपूरवरुन हे कुटुंब वरातीसाठी आलं होतं. सिराथूमधील लेखापालच्या घरी हा लग्न समारंभ होता. या अपघातामध्ये लेखापालची पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला आहे.