‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराचे आरोप करतात’
देश बातमी

‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराचे आरोप करतात’

छत्तीसगढ : महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात’, असं संतापजनक वक्तव्य नायक यांनी केले आहे. तसेच, अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमांसच्या जाळ्यात फसू नये, असा सल्लाही किरणमयी नायक यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

छत्तीसगढमधील बिलासपूर येथे महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर बोलताना किरणमयी नायक म्हणाल्या की, “अनेक प्रकरणांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि सहमतीन संबंध ठेवल्यानंतर काही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, तुम्ही आधी नातं समजून घ्या. जर तुम्ही एखाद्या अशा रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा परिणाम अत्यंत वाईट असतील.”

त्या पुढे म्हणाल्या की, ”अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे,” असं नायक म्हणाल्या. “बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात.”

तसेच, “सहमतीने संबंध ठेवल्यानंतर नातं तुटल्यानंतरच्या बहुतांश घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला आणि पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे.” असंही नायक म्हणाल्या.