मृत्यूनंतरही हाल! सकाळपासून मृतदेह घरात, नदीतील पाणी ओसरल्यावर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारा विडिओ
पश्चिम महाराष्ट्र बातमी

मृत्यूनंतरही हाल! सकाळपासून मृतदेह घरात, नदीतील पाणी ओसरल्यावर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारा विडिओ

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे काल मंगळवारी मुस्लिम समाजातील मयताच्या अंत्यविधीसाठी हरणा नदीतून ग्रामस्थांनी वाट काढत मयत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कमरे एवढ्या पाण्यातून आपले जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत मृतदेहाला नदीच्या पलीकडे असणार्‍या मुस्लिम स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, मुस्ती येथील वृद्ध महिलेचं मंगळवारी सकाळी निधन झाले होते. पण मुस्लिम स्मशानभूमी नदीपलीकडे असल्याने नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागली. सकाळपासून मृतदेह घरातच होता. प्रशासनाला यापूर्वी अनेकदा वारंवार पूल बांधण्याची विनंती करून देखील दखल घेतली जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सकाळपासून मृतदेह घरात

मेहताबबी मकांनदार (वय ८५ रा.मुस्ती,ता दक्षिण सोलापूर) या महिलेचं अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली होती. पण हरणा नदीला पाणी भरपूर असल्याने मुस्लिम स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला होता. शेवटी ग्रामस्थांनी नदीतील पाणी कमी झाल्यावर नदीपलीकडे जाऊ असा निर्णय घेतला. काल सायंकाळपर्यंत ग्रामस्थांना नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागली. सकाळपासून मृतदेह घरातच होता. अखेर सायंकाळी धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://twitter.com/echawadimedia/status/1567420116920565766

नदीपलीकडे जाण्यासाठी पूल नाही; यापूर्वी एक तरुण वाहून गेला होता

एक महिन्यापूर्वी याच नदीपात्रातून मुस्ती गावातील तरुण नदीपात्रातून वाहून गेला होता. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यांनतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापुरातील संपर्क प्रमुख यांनी देखील गावात येऊन ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. पण आजतागायत काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. ग्रामस्थ हे आपला जीव धोक्यात घालून नदीपार करत आहेत. अशा दुर्घटना वारंवार घडू नये म्हणून ग्रामस्थांनी हरणा नदीवर पूल बांधण्यासंबंधी वारंवार प्रशासनाकडे मागणी करुन सुध्दा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

एक महिन्यापूर्वी नदीतून अंत्यसंस्कार यात्रा

९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता हरणा नदीत असाच प्रकार पाहायला मिळाला होता. नूर मोहम्मद शहाबअली भांडारी (वय ४५ ,रा. पितापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांची अंत्ययात्रा देखील ग्रामस्थांनी नदीतून नेली होती. आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे नदीमधील अंत्ययात्रा पाहावयास मिळाली आहे.