मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले…

नांदेड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ”ओबीसीच्या अरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. पण विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करत असतील, तर ते चुकीचं आहे, असं मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. आजही तिच भूमिका आहे. महाविकास आघाडीतही यासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, कोणत्याही त्यामध्ये बदल न करता, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, हिच सरकारची भूमिका आहे. यामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम विरोधक करत असतील, तर ते चुकीचं आहे.”

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. “काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या विषयावर महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असावी. या विषयावर पाटील यांनी महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते, आमदार यांचे मत जाणून घेतलं आहे. आता निर्णय पक्षाध्यक्षांनी घ्यायचा आहे.” असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

तर, अशोक चव्हाण बाभळी बंधाऱ्याच्या पाणी विसर्गाविषयी बोलताना म्हणाले की, “बाभळी बंधाऱ्यांच्या पाणी विसर्गाविषयी सर्वोच्च न्यायालयानं मागे निर्णय दिला होता की, 28 तारखेपर्यंत बंधाऱ्याचे गेट खुले ठेवण्यात यावे. बंधाऱ्याचे गेट उघडे असल्यामुळे महाराष्ट्राचं पाणी तेलंगणात वाहून जात आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला पण, बाभळी बंधाऱ्याचा गेट उघडा असल्यामुळे पुराचं पाणी समुद्रात वाहून गेल, त्यामळे तेलंगणानं पूर कमी झाल्यानं पोचमपाट धरणात पाणी अडवावं. या विषयावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं बोलणं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालं, पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही.”