रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल
बातमी मुंबई

रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल

मुंबई : अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आझाद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्णब देशद्रोही असल्याच्या घोषणांसह अर्णब गोस्वामी मुर्दाबाद, आझाद समाज पार्टी जिंदाबाद, चंद्रशेखर भाई जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात चंद्रशेखर आझाद आणि आझाद समाज पार्टीचे बॅनर होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यासोबत मराठीची बदनामी करणारा अर्णब गोस्वामी मुर्दाबाद, शहीद सैनिकांची थट्टा करणारा अर्णब गोस्वामी मुर्दाबाद अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यालयात घुसताना पोलिस प्रशासनाने आंदोलकांना आडवत ताब्यात घेतले. आझाद समाज पार्टीचे अतुल खरात, विक्की शिंगारे, नागेश शिर्के, नितीन जाधव, योगेश आहिरे यांच्यासह पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणानंतर आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राहुल प्रधान म्हणाले, ‘अर्णब गोस्वामी विरोधात आंदोलने व्हायला हवीत आणि आता आम्ही अर्णबविरोधात आक्रमक झालो आहोत. अर्णब गोस्वामीने मराठी लोकांचा अपमान केला आहे. मराठीची थट्टा केली आहे. अर्णबला अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र, अर्णब यांचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर भाजप या प्रकरणावर शांत राहिले. अर्णब गोस्वामी यांच्यावर केंद्र सरकार काही कारवाई करणार आहे का असा सवालही यावेळी राहुल प्रधान यांनी केला.