मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती (एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी, जेणेकरून नियोजन पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे स्पष्ट आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊनची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्रशासनाने लॉकडाऊनची तयारी करावी, ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा, मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई-आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी, वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत, सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे, असे काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या बैठकीत घेतले आहेत.