‘अमृत ज्येष्ठ नागरिक‘ योजनेला मोठा प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला
बातमी महाराष्ट्र

‘अमृत ज्येष्ठ नागरिक‘ योजनेला मोठा प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सर्व प्रकारच्या बसमधून 87 दिवसात दोन कोटी 8 लाखाहून अधिक ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत देण्याची घोषणा केली होती. या योजनेला राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ या ८७ दिवसात दोन कोटी ८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतला आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक‘ हे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री. चन्ने यांनी सांगितले.

सवलत योजनेची वैशिष्ट्ये
वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये 50 टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.