दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष
बातमी महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केल्यानंतर मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली होती. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र, अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संभ्रम दूर केला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. या सर्वांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि. ८ ऑगस्ट २०२० नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.

१. विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
२. विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/तोडीं परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
३. विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण या प्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूनक यासाठी ५० टक्के भारांश

कोविड-१९ पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली
सदर मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इयत्ता नववीचा) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.

जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यंकडून करण्यात येईल. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे.

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी
पुनर्परीक्षार्थी (रिपीटर), खासगी (फॉर्म-१७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील. शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इयत्ता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी घेणार आहोत. सदर प्रवेश परीक्षा मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.