कोरोनावर मात करणाऱ्यांना ९ महिन्यानंतर लस
देश बातमी

कोरोनावर मात करणाऱ्यांना ९ महिन्यानंतर लस

नवी दिल्ली : सरकारच्या एका पॅनलने कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना ९ महिन्यांनंतर लस देण्याचा सल्ला दिला आहे. लसीकरणासंदर्भातील अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या पॅनेलने हा सल्ला दिला आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या पॅनलने दिला होता. याच पॅनलने आता सरकारला कोरोनामुक्त झालेल्यांचं लसीकरण कोरोनामुक्तीनंतर नऊ महिन्यांनी करण्यात यावं असा सल्ला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आधी या दोन डोसांमधील अंतर चार ते आठ आठवडे इतकं होतं. तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणाऱ्या या पॅनलने दोन डोसांमधील अंतर किती असावं यासंदर्भात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधील अंतर वाढवण्यात यावं असं म्हटल्याचं समजतं. पॅनलने दिलेल्या सल्ल्यानुसार संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल. इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना करोनामुक्तीनंतर किती महिन्यांनी लस देण्यात यावी याचा कालावधी वाढवण्याचा सल्ला देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

इतकंच नाही तर गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही करोनाची लस देण्यात यावी असा सल्लाही या पॅनलने दिला आहे. आरोग्य मंत्रालय यासंदर्भातील निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर लसीचा पहिला डोस घेण्यासाठी सहा महिन्यांचं अंतर सुरक्षित आहे.