आणखी एक सैराट! सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून तरुणाची हत्या
देश बातमी

आणखी एक सैराट! सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून तरुणाची हत्या

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मराठीत आलेला चित्रपट सैराटच्या कहानीची पुनरावृत्ती गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील लिंबली गावचा रहिवाशासोबत घडली आहे. या तरुणाने आणि त्याच्या पत्नीने चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्याच्या सासरच्या मंडळींचा या विवाहाला विरोध होता. त्याच रागातून त्यांनी तरुणाची हत्या केली आहे. जयसुख असं मृत तरुणाचं नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या तरुणाचा मृतदेह त्याच्या गावापासून १५ किलोमीटर दूर आढळला होता. पोलिसांना मृतदेहावर जखमा आढळल्या असून त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर सासरचे लोक जयजयसुखची पाळत ठेवून बसले होते. त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर जबरदस्तीने ते जयसुखला कारमध्ये बसवून घेऊन नेले. आरोपींमध्ये जयसुखच्या पत्नीचा भाऊ, तिचे नातेवाईक आणि एक अनोळखी व्यक्ती असल्याचं जयसुखच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी सर्वजण हे अमरेली जिल्ह्यातील नानी कुंडल गावचे रहिवाशी असून घटना घडल्यानंतर ते फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जयसुख आणि त्याच्या पत्नीने ४ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मुलीचे कुटुंबीय या लग्नामुळे खुश नव्हते, त्यामुळे हे दोघं लिंबली गावात राहायला आले होते.

दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच लग्नाच्या तब्बल ४ वर्षांनी आरोपींनी जयसुखवर हल्ला का केला, याचा तपास आम्ही करतोय, असं पोलिसांनी सांगितलं.