निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून ३ आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जमीन मंजूर
देश बातमी

निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून ३ आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जमीन मंजूर

टूलकिट (दस्तावेज) प्रकरणी संशयित असलेल्या वकील निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने निकिता जेकब यांना ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे निकिताला मोठा दिलासा मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केली. त्यानंतर अ‍ॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले. अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. निकिता ‘टूलकिट’च्या एक संपादक आहेत.

न्यायालयात सुनावणीदरम्यान, निकिता यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तपासाला सहकार्य करत असताना तिला अटक केली जाऊ शकत नाही. टूलकिटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की त्यामुळे लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेसाठी ‘टूलकिट’ ला जबाबदार धरण्यात यावे. यावर आज न्यायालयाने निकिता जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या दरम्यान त्यांना अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी याचिकेवर निर्णय दिला.

तर दुसरीकडे, शंतनू यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली होती. तर निकिता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शंतनू यांना काल (१६ फेब्रुवारी) खंठपीठाने अंतरिम जामीन दिला. निकिता यांचे वकील मिहीर देसाई यांनी काल न्यायालयाला सांगितले की, याच प्रकरणात संशयित असलेले शंतनू मुळूक यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. मात्र, यावर दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण येत नसल्याने न्यायालय त्यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटले होते.

दरम्यान, थनबर्ग हिचे ‘टूलकिट’ या प्रकरणी अटकेत असलेली पर्यावरणवादी दिशा रवी आणि जेकबसह खलिस्तानी चळवळीत सहभागी असलेल्यांनी तयार केले व समाजमाध्यमावरून ते प्रसारित केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होते. त्यात ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करून दिल्ली पोलिसांनी जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती.