राज्य सरकारचा मोठा निर्णय; या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद

मुंबई : राज्यातील कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. म्युकरमायकोसिस आणि कोरोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले असल्याचे टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी सांगितले आहे.

टोपे म्हणाले, ‘सरसकट चाचण्या करणं टाळायला हवं. बाधितांच्या जवळच्या ज्या रुग्णांना सर्वाधिक धोका आहे तसेच ज्यांना कमी धोका आहे, अशांच्याच चाचण्या करण्यात याव्यात. जनरल टेस्टिंग टाळून फोकस टेस्टिंगवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लसींच्या ग्लोबल टेंडरसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अद्याप कोणत्याही राज्याच्या लसींच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करावं.

खालील जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद
बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, मुंबई, पुणे, ठाणे हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील होम आयसोलेशन आता बंद करण्यात येईल.