शबनमला फाशी दिल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल; महंत परमहंस
देश बातमी

शबनमला फाशी दिल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल; महंत परमहंस

लखनऊ: स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव असून उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र काळात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला असलेल्या शबनमसाठी आता महंत परमहंस यांनी पुढाकार घेतला आहे. महंत परमहंस यांनी टाईम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शबनमच्या दया याचिकेचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच, यावेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा महत्त्वाचे स्थान आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही. तसे झाल्यास तुम्ही दुर्दैवी आपत्तींना तोंड द्याल. शबनमचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. परंतु, एक स्त्री म्हणून तिची फाशीची शिक्षा मागे घेतली पाहिजे. शबनमने तुरुंगात राहून गुन्ह्याचे प्रायश्चित भोगले आहे. तिला फाशी देण्यात आली तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल. असे महंत परमहंस यांनी म्हटले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शबनमच्या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची विनंती केली होती. वास्तविकतः आतापर्यंत बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली आहे. भारतात फाशीची शिक्षा होणे, ही खूपच गंभीर बाब मानली जाते. मात्र, शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार आहे.

उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमला फाशी देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे फाशीची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर शबनमला लगेच फाशी दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिली.

शबनमला फाशीची शिक्षा का ?
उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे राहणाऱ्या शबनमच्या कुटुंबात तिचे वडील, आई, भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांचे महिन्यांचे बाळ यांचा समावेश होता. शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले. सलीमला भेटण्यासाठी सुरुवातीच्या शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.

14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपले होते. शबनम आणि सलीमने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया हीदेखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाहा ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या 10 महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने कुऱ्डाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले. शबनमने कुऱ्हाडीने या सातही जणांचे शीर धडावेगळे केले. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानेही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता.