मुंबई : गेल्या आठ नऊ महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली लोकल आता सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. सर्वसामान्यांना पहाटे लोकल सुरु झाल्यानंतर ते सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 10 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळू शकणार आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दरम्यान, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई लोकल बंद करण्याचा करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्यानं वकील, शिक्षक आणि महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची दारं खुली करण्यात आली नाहीत.
मात्र आता मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मुंबई महानगरपालिकेला यश आलं आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत ते रात्री 10 वाजल्यानंतर सर्वसामान्य लोकं मुंबई लोकलमधून प्रवास करु शकतात, असं या प्रस्तावात म्हटलं आहे.
परंतु, काल राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे 8 रुग्ण सापडले. त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र आता राज्य सरकार मुंबई लोकलसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई लोकलसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.