मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे करोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत नागरिकांचं आणि प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे.
Despite the tremendous natural calamities, today Maharashtra set a benchmark of being India’s first and only (as yet, and we hope for many more states soon) to have fully vaccinate 1 crore people.
Congratulations to our doctors, nurses, medics and other officials for this!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 26, 2021
आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यात आज सुमारे 4 हजार 100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.