दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
बातमी महाराष्ट्र

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस

मुंबई : दहावी आणि बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता काही दिवसच उरले आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. तर 29 एप्रिलपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. 12 वीच्या परीक्षेचा निकाल साधारण जुलै महिन्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रील 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना मिळतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक असणार आहे. 9 ते 12 वी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले असून जवळपास 50 एक दिवसआड एक विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं जात आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मास्क, सॅनिटायझरचा वापर करणं याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या या विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे विद्यार्थांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या काही राज्यात कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण मुंबईत अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील पडला होता.