तर महाराष्ट्रातील लसीकरण तीन दिवसांत बंद पडेल : राजेश टोपे
बातमी महाराष्ट्र

तर महाराष्ट्रातील लसीकरण तीन दिवसांत बंद पडेल : राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रातील लसीकरण तीन दिवसांत बंद पडेल अशी धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असून महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडेल असे टोपे यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो, असं ते म्हणाले आहेत. केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्दतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे, अशी टीका राजेश टोपे यांनी केली आहे.