राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा; धोका मात्र कायम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा; धोका मात्र कायम

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत सातत्याने कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. परिणामी, राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांमध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १९८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रिया सुरू केली गेली असून, करोना निर्बंध शिथिल केले जात आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५६ लाख ९९ हजार ९८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९० लाख ७८ हजार ५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ५४ हजार ५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ५४ हजार ४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३४ हजार ७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.