जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २५ जुलै आणि २७ जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणं कठीण आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल आणि लवकरच नवी तारीख जाहीर केली जाईल, असं ट्वीट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे.

तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २७, २८ आणि ३० एप्रिल २०२१ दरम्यान होणार होती. मात्र, देशातला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधली परीक्षा पार पडली होती.