जालना : रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीनी रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच काळाबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आले. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीनं हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्यानं काळाबाजार होणार नाही. यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.