मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा सुटला गुंता
बातमी मुंबई

मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा सुटला गुंता

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक विशेष फेसबुक पोस्ट करून, माहिती दिली आहे. शिवदीप लांडे यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लांडे पुढे म्हणतात, मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट करतो, ज्यांनी मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र एक करून, या प्रकरणाचा न्यायपूर्णरित्या छडा लावला. ही केस माझ्या करिअरमधील आतापर्यंतच्या सर्वात कठीण केस पैकी एक होती.

हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या दोघांना अगोदर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आले आहे. निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं.