‘केंद्र- राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ’
बातमी मराठवाडा

‘केंद्र- राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ’

औरंगाबादः दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडत केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हिवाळी अधिवेशनात बोलताना जलील म्हणाले की, शेतकऱ्यांची आत्महत्या आमच्यासाठी आता फक्त एक आकडेवारी म्हणून राहिली असून हे गंभीर आहे. गेल्या एक वर्षात मराठवाड्यात ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून औरंगाबाद जिल्ह्यात १५० आणि बीड जिल्ह्यात १७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून आमचा एमएसपीबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जलील म्हणाले.

तर पुढे बोलतांना जलील म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून फक्त पंचनामे केले जातात. तर केंद्र सरकारकडे असलेल्या पैसा मिळत नसल्याचं राज्य सरकार म्हणते, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या वादात शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही खूप चिंतेची बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून अतिवृष्टी झालेल्या भागासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे अशी मागणी जलील यांनी यावेळी केली.

खासदार जलील

विम्याचे पैसे मिळेना…

लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना जलील यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र आणि राज्य सरकार याच्या वादात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा पीक विमा मिळत नसल्याचं यावेळी जलील म्हणाले. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जलील यांनी केली.

अजूनही शेतकरी मदतीपासून वंचीत

मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून १० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. सुरवातीला शंभर टक्के मदतीची घोषणा केल्यातनंतर पुढे ही मदत सध्या ७५ टक्के देण्याचं ठरलं. पण अजूनही मराठवाड्यातील शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित असून, त्यांना मदत मिळाली नाही. तर बँक आणि महसूल विभागाच्या गोंधळाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.