मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…
देश बातमी

मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…

मुंबई : मुंबई पोलिसांची सोमवारी उच्च न्यायालयात सदर केलेल्या अहवालामुळे आता रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अर्णब गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिली. असा धक्कादायक गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणी, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रिमांड कॉपीमध्ये पहिल्यांदाच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख केलाय. अटक करण्यात आलेले BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या पोलीस कोठडीत 30 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं निर्देश दिलेत.

मुंबई टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करताना हा खुलासा केला. पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे.

दरम्यान, गोस्वामी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, “पार्थो दासगुप्ता ‘बीएआरसी’चे सीईओ असतानाच्या काळात अर्णव गोस्वामी आणि इतर आरोपींनी रिपब्लिक भारत हिंदी आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी वृत्तवाहिनीची टीआरपी वाढवून दाखविण्यासाठी गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना अनेकदा लाखो रुपयांची लाच दिली, असं चौकशीत समोर आलं आहे.

टीआरपी घोटाळ्याची चौकशी करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, दासगुप्ता यांनी चौकशीदरम्यान अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये तीनवेळा भेटल्याची कबुली दिली आहे. या भेटीदरम्यान लाखभर रुपये रोख स्वरुपात गोस्वामींनी दिले आहेत. यात एकदा यूएस डॉलरचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मात्र आरोपी म्हणून अर्णब गोस्वामी यांचं नाव नमूद केलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिककडून मिळालेल्या पैशातून दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या आहेत. या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये १ लाख रुपये किमतीचं घड्याळ आणि इमिटेशन ज्वेलरीसह २.२२ लाख किमतीचे काही मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.