समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?; शाळेचा दाखला आला समोर
बातमी मुंबई

समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?; शाळेचा दाखला आला समोर

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची धार्मिक ओळख कोणती यावरून निर्माण झालेला संभ्रम अधिकच वाढला आहे. वानखेडे यांच्या शाळेचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यातून समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याकडं लक्ष वेधलं असून ही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचं म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समीर वानखेडे यांनी खंडणीसाठी रचल्याचा नवाब मलिक यांचा आरोप आहे. त्याशिवाय वानखेडे यांच्यासह त्यांच्या कंपूनं बड्या घरातील लोकांना अनेक खोट्या प्रकरणांमध्ये अडकवल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही अनेक घोटाळे केल्याचा मलिक यांचा दावा आहे. खोटे जात प्रमाणपत्र दाखवून त्यांनी सरकारी नोकरी मिळवली असून ते धर्मानं मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ‘दाऊद’ आहे, असा दावा मलिक यांनी केला होता.

मलिक यांच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच, मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटींचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं दोन्ही बाजूंना आपापलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मलिक यांनी वानखेडे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

मलिक यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. समीर वानखेडे यांचा सेंट पॉल शाळेचा दाखलाही त्यांनी न्यायालयाला दिला आहे. त्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद असं असून धर्म ‘मुस्लिम’ अशी नोंद आहे. त्यावरून मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधला आहे

यापूर्वी मलिक यांनी वानखेडे यांचा एक जन्मदाखला सोशल मीडियात शेअर केला होता. मात्र, तो खोटा असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं होतं. क्रांती रेडकर यांनीही काल एक जन्मदाखला प्रसिद्ध केला होता. त्याबाबत विचारलं असता मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला. वानखेडे हे बनावट नोटांचे खेळाडू आहेत. त्यामुळं नकली कागदपत्रे कशी बनवायची हे त्यांना चांगलं माहीत आहे. पण हा खेळ फार काळ चालणार नाही,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे.