पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन अडचणीत
देश बातमी

पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन अडचणीत

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशननं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. आयएमएनं एक प्रेस रिलिज जारी करत डॉ. हर्षवर्धन यांना अनेक सवालही केले आहे. या निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यावरही भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरतरं, “नियमानुसार कोणत्याही डॉक्टरला कोणतंही औषध लाँच करण्याची परवानगी नाही. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्री हे एक डॉक्टर आहेत, त्यांच्याद्वारे औषध प्रमोट करणं आश्चर्य आहे,” असंही निवेदनाद्वारे म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

औषध लाँच केल्यानंतर बाबा रामदेव यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेद्वारे तयार केलेलं कोरोनिलशी निगडीत दस्तऐवज आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केल्याचं म्हटलं होतं. तसंच काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी या औषधाला जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील १५४ देशांची मान्यता मिळाल्याचंही म्हटलं होतं. परंतु जागतिक आरोग्य संघटनेद्वारे याचं खंडन करण्यात आलं. यानंतर आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीवरून आयएनएनं प्रश्न उपस्थित केले होते.

नक्की काय आहे प्रकरण ?
काही महिन्यांपूर्वी योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले होते. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली होती. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आश्चर्य व्यक्त केलं होतं.

यानंतर आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून स्पष्टीकरण दिलं होतं. ”जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाला स्वीकारलं किंवा नाकारलही नाहीये. डब्ल्यूएचओ जगभरातील लोकांसाठी एक चांगले, आरोग्यदायी भविष्य घडविण्यासाठी कार्य करते,”असं ते म्हणाले होते.

दरम्यान, कोरोना विषाणू पुन्हा स्ट्रेन बदलत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेली औषधं निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांमध्येच आहे. देशात २४० नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे.