स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव आहे का?; मोदी सरकारने लोकसभेत दिले ‘हे’ उत्तर
बातमी विदर्भ

स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव आहे का?; मोदी सरकारने लोकसभेत दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली: महाराष्ट्रातून विदर्भ हा भाग वेगळा करून स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीला राजकीय पाठबळ नसलं तरी याप्रश्नावर सातत्याने आंदोलने होत आली आहेत. अशावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपची याबाबत नेमकी भूमिका काय, हा प्रश्न सातत्याने विचारला जात असून आज लोकसभेतील एका लेखी उत्तरातून ही भूमिका समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विदर्भ हे स्वतंत्र राज्य बनवण्याचा काही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे का आणि असा प्रस्ताव विचाराधीन असेल तर त्यावर केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. राय यांनी आपल्या लेखी उत्तरात विदर्भ राज्याच्या स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले.

विदर्भ राज्याच्या स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही. वेगळं राज्य स्थापन करण्याबाबत अनेक मागण्या येत असतात. कधी वैयक्तिक पातळीवर तर कधी संघटनेच्या माध्यमातून देशभरातून अशा मागण्या येतात. तशी निवेदनही आम्हाला दिली जातात. मात्र, विदर्भाबाबत असा कोणताही प्रस्ताव वा मागणी आमच्याकडे आलेली नाही, असे राय यांनी नमूद केले. नवीन राज्याची निर्मिती ही मोठी आणि व्यापक परिणाम करणारी प्रक्रिया असते. आपल्या देशाच्या संघराज्य पद्धतीशी ही प्रक्रिया निगडीत आहे. अशावेळी नवीन राज्याच्या निर्मितीबाबतचा निर्णय हा केवळ आणि केवळ सर्व संबंधित घटकांचा विचार करूनच घेतला जात असतो. त्यासाठी व्यापक सहमतीचीही आवश्यकता असते, असेही राय यांनी पुढे स्पष्ट केले.