बॉम्बे हायजवळ बुडालं ओएनजीसीचं जहाज; १४७ जणांना वाचवण्यात यश
बातमी मुंबई

बॉम्बे हायजवळ बुडालं ओएनजीसीचं जहाज; १४७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने बॉम्ब हायजवळच्या परिसरात ओएनजीसीचं पी ३०५ (पापा-३०५) मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात बॉम्बे हाय असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ओएनजीसीचं जहाज पी ३०५ उभं होतं. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकले आहे. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झालं. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्यास जो संदेश पाठवला जातो, त्याला संक्षिप्त स्वरूपात एसओपी म्हटलं जातं) संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं होतं, असं ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

ओएनजीसीच्या पी ३०५ जहाजाने जलसमाधी घेतली असून, असलेल्या २६० जणांपैकी १४७ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश आलं आहे. सकाळपासून इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदलाचे पी ८१ हे जहाज समुद्रात इतरांचा शोध घेत आहे. या शोध मोहिमेत किनाऱ्यालगत तैनात असणाऱ्या एनर्जी स्टार आणि अहल्या या दोन नौकाही उतरवण्यात आल्या असल्याचं नौदलाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत पी३०५ वरून १४६ लोकांना वाचवण्यात आलं आहे. आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौकांनी १११ लोकांना वाचवलं आहे. तर ओएसव्ही आणि ग्रेटशिप अहिल्या या दोन्ही नौकांनी १७ लोकांना वाचवले. ओएसव्ही ओशन एनर्जी या नौकेने १८ जणांना सुखरूप बाहेर काढलं, असं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.