भयानक ! बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांचे मृतदेह पाण्यात; गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच
देश बातमी

भयानक ! बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांचे मृतदेह पाण्यात; गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच

पटना : एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना गंगेच्या किनारी कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासन चिंतेत आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चौशा शहरात हा प्रकार घडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गावकरी सकाळी जेव्हा नदी किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संबंधित कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी किंवा दफन करण्यासाठी जागा मिळाली नसावी असा अंदाज आहे.

४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते, अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील बहारिच, वाराणसी किंवा अलाहाबाद यापैकी कोणत्या शहरातील आहेत याचा तपास करणार आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे मृतदेह बिहारमधील नसल्याचे स्पष्ट करताना आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान या मृतदेहांमुळे पाण्यातून संसर्ग फैलावण्याची भीती सध्या शहरात आहे. मृतदेहांचा खच लागला असून अनेक श्वानदेखील त्याठिकाणी दिसत होते. यामुळे स्थानिकांच्या मनात खूप भीती आहे. दरम्यान मृतदेहांवरुन सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.