कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा
देश बातमी

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनामुळे मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशात असंख्य मुलं अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले अशांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. त्याशिवाय, या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून लावली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा स्टायपेंड अर्थात निश्चित अशी रक्कम दिली जाईल. त्यासोबतच त्यांनी वयाची २३ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना १० लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. त्यांच्या भवितव्यासाठी ही रक्कम त्यांना मोठा हातभार लावणारी ठरेल.

त्याचबरोबर, मुलांच्या शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च हा केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी या मुलांना शून्य टक्के व्याजदराने शिक्षणकर्ज उपलब्ध होईल. शिक्षण आणि आर्थिक मदतीसोबतच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत या मुलांचा ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील काढला जाईल. १८ वर्षांपर्यंत या मुलांना या विम्याचं संरक्षण राहील. या विम्याचे हफ्ते केंद्र सरकारकडून भरले जातील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी अशा प्रकारे आर्थिक मदत देता येईल का, यावर सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे.