पंतप्रधान मोदींचा नवा रेकॉर्ड, सर्वाधिक लांबीचं भाषण, जाणून घ्या किती वेळ बोलले?
देश बातमी

पंतप्रधान मोदींचा नवा रेकॉर्ड, सर्वाधिक लांबीचं भाषण, जाणून घ्या किती वेळ बोलले?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक कृती आणि त्यांचं प्रत्येक विधान हे कायमच चर्चेचा विषय ठरतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या भाषणाच्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आपल्या सर्वाधिक लांबीच्या भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर १ तास २२ मिनिटे ३२ सेकंदांचे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते. मात्र, आता त्यांनी स्वत:चाच हा विक्रम मोडीत काढला आहे. (PM Narendra Modi speech at red fort)

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी देशाला उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणाची लांबी ७२ मिनिटे होती. २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी ९४ मिनिटांचं भाषण करत हा विक्रम मोडीत काढला. २०१४ पासून नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा ९० मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले आहेत. २०१७ साली ते सर्वात कमी म्हणजे ५६ मिनिटं बोलले होते. तर २०१८ मध्ये ८३ मिनिटं, २०१९ मध्ये ९२ मिनिटं, २०२० मध्ये ९० मिनिटं, तर २०२१ मध्ये ८८ मिनिटांचं भाषण पंतप्रधान मोदींनी केले होते.

नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत अलीकडच्या काळातील पंतप्रधानांच्या भाषणाची लांबी फारच कमी होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ आणि २००३ साली अनुक्रमे २५ आणि ३० मिनिटांचे भाषण केले होते. मनमोहन सिंह यांनी दहावेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी ५० मिनिटं इतका होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच लांबलचक भाषणांची सुरु केलेली परंपरा कायम आहे. आज नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक लांबीचे भाषण करुन नवा मापदंड रचला आहे.

नरेंद्र मोदी भाषणात काय म्हणाले?

आगामी काळात भारताच्या विकासाच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचप्राण’ या नव्या संकल्पनेनुसार वाटचाल करण्याची घोषणा केली. पहिला पंचप्राण म्हणजे, यापुढे देशाने खूप मोठे संकल्प निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. तरच भारताचा विकास शक्य आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दुसरा पंचप्राण म्हणजे देशवासियांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेही गुलामीचा अंश असू नये. प्रत्येकाने आपल्या मनातील गुलामीची जाणीव काढून टाकली पाहिजे. शेकडो वर्षांच्या गुलामीमुळे आपल्या मनात अनेक विकृती तयार झाल्या आहेत. ही गोष्ट आपल्या मनातून शतप्रतिशत काढून टाकली पाहिजे. त्यामुळे यापुढे देशात गुलामीचे प्रतिक असलेली कोणतीही गोष्ट आढळून आली तर ती काढून टाकुयात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.