रामदास आठवले या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार
पुणे बातमी

रामदास आठवले या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मातंग समाजाच्या प्रश्नासाठी राज्यातील मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांसह शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या राज्यव्यापी परिषदेत जाहीर केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मातंग समाजाच्या अडचणी आणि प्रमुख प्रश्न जाणून घेण्यासाठी मातंग समाजातील प्रमुख नेत्यांसह विविध संघटनाच्या प्रमुखा बरोबर आज पुण्यात राज्यव्यापी परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की मातंग समाजाचे काही प्रश्न हे राज्य सरकार च्या हातात आहेत त्यासाठी ही आपण राज्य सरकार बरोबर चर्चा करून हे प्रश सोडविणार असल्याचे म्हणाले.तसेच मातंग समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सहा वर्षे बंद आहे .ते लवकरच चालू करण्यासाठी आपण आग्रही रहाणार असल्याचे म्हणाले. यावेळी मातंग समाजाच्या मागण्याचे निवेदन खासदार रामदास आठवले यांना देण्यात आले.

राष्ट्रवादीचे विजय डाकले यांनी प्रास्ताविक केले .माजी आमदार राम गुंडीले यांनी मातंग समाजातील तरुण बेरोजगार झाले तर ते गुन्हेगार होतील त्यामुळे बंद असलेले महामंडळ तात्काळ सुरू करण्याची मागणी केली .डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे यांनी आम्हाला न्याय न मिळाल्यास येत्या विधानसभा ,लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे बोलले .अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य रवींद्र दळवी यांनी मातंग विकास विभाग वेगळा करावा अशी मागणी केली .यावेळी मातंग आयोगाचे माजी उपाध्यक्ष दिलीप आगळे यांनी आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या अशी मागणी केली.