पुण्यातील तीन पर्यटकांचा आंजर्ले समुद्रात बुडून मृत्यू; तर तिघांना वाचवण्यात यश
कोकण बातमी

पुण्यातील तीन पर्यटकांचा आंजर्ले समुद्रात बुडून मृत्यू; तर तिघांना वाचवण्यात यश

पुणे : पुण्यातील तीन पर्यटकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकूण सहाजणपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी दापोली तालुक्यात आले होते. हे पर्यटक आज (१८ डिसेंबर) दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.

ही घटना किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे तरुण बुडाल्याचं दिसून येताच स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांना फक्त तिघांचेच प्राण वाचण्यात यश आलं. इतर तीन पर्यटक तोपर्यंत पाण्यात बेपत्ता झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेतला. काही वेळाने या तिघांचेही मृतदेह आढळून आले. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.