आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १०पालख्यांनाच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारीसंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमांतून पंढरपुरात पोहोचतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तर शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्या वर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.