नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचेशेकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. गेल्या महिनाभारत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्या मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच आज पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. त्यांमुळे आजच्या चर्चेत तोडगा निघणार का? याकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजता शेतकरी आणि सरकारमध्ये ही बैठक होणार आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दुपारी दोन वाजता विज्ञान भवनात बैठक होत आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दरम्यान, शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेत सरकारच्या भूमिकेवर विचारमंथन करण्यात आलं. तर दुसरीकडे मागील महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. केंद्र सरकारनं चर्चेसाठी निमंत्रित केल्यानंतर शेतकरी संघटनांनीही बैठकीतील चर्चेच्या मुद्द्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
यानुसार, तीन कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, किमान आधारभूत किमतीची हमी द्यावी, वीजदुरुस्ती विधेयकात बदल करावेत आणि खुंट जाळल्याबद्दल होणाऱ्या कारवाईतून शेतकऱ्यांना वगळावे, असे चार मुद्दे शेतकऱ्यांनी केंद्रापुढे ठेवले आहेत. या चार मुद्द्यांवर तर्कशुद्ध तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, असे पत्र ४० संघटनांच्या वतीने मंगळवारी केंद्राला पाठवलं आहे.
‘स्वराज इंडिया’चे नेते योगेंद्र यादव यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘‘या बैठकीत तोडगा निघू शकतो. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, अन्य मंत्र्यांच्या तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ५ डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या पलीकडे जाऊन केंद्राने एक पाऊल पुढे टाकले तरी तोडगा निघेल, अन्यथा शेतकरी संघटनांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांचा बुधवारचा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाचा मंगळवारी ३४ वा दिवस होता. दिल्लीच्या वेशींवरील आंदोलकांचे साखळी उपोषणही कायम आहे.