उद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली
बातमी महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली

मुंबई : “पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्र्यांनी आज नववर्षाचं स्वागत मुंबई पोलिसांसोबत मुंबई पोलीस आयुक्तालयात केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”पोलीसंही माणसं आहेत. पण तरी तुम्ही दक्ष राहता, म्हणून आम्ही सण साजरे करू शकतो. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक नागरिक म्हणून तुमचे आज आभार मानतो. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती जी काही नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, “कोरोनाच्या काळात फ्रण्टलाईनवर लढताना अनेक पोलीस शहीद झाले. कोरोनाचं संकट आल्यावर आपण लॉकडाऊन केलं. वर्क फ्रॉम होम, सगळ्यांना सांगितलं घरातून काम करा. क्षणभर विचार करा, पोलिसांनी वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केलं असतं तर काय झालं असतं? पण तसं झालं नाही. म्हणून आता जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती त्यांच्यामुळेच.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “तुम्ही सतत ताणतणावात असता. मात्र नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या सोबत करावी, या जाणिवेने मी महाराष्ट्र आणि मुंबईतील नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. तुम्हाला हे वर्षच नाही तर पुढील अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि ताणमुक्ततेची जावो, अशी प्रार्थना करतो.”