महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून ‘ब्रेक’, नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार
देश बातमी

महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून ‘ब्रेक’, नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार

नवी दिल्ली : देशभरातील विविध महामार्गांवरील वाहनांच्या नवीन वेगमर्यादेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय घेतल्यांतर आता कोणाला महामार्गांवर हव्या त्या वेगाने वाहन चालवताच येणार नाही. ही महत्त्वाची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin GAdkari) यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि राज्य सरकारांना विश्वासात घेऊन दुपदरी आणि चौपदरीसह विविध महामार्गांवरील नवीन वेगमर्यादा लवकरच ठरवली जाईल, असे ते म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशभरात महामार्गांवर दरवर्षी पाच लाख अपघात होत असतात. हे पाहता रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या अपघातांमध्ये जितके लोक मरतात तितके लोक कोणत्याही साथीच्या रोगात, मारामारीत किंवा दंगलीत मरत नाहीत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

सेललिब्रिटींचेही घेतले जाणार सहकार्य

महामार्गांवर होणाऱ्या अशा अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामासाठी सेलिब्रिटींचेही सहकार्य घेतले जात असल्याचे गडकरी म्हणाले.

सरकार नवीन दर्जेदार असे रस्ते बांधण्याचे काम करत आहे. अशा रस्त्यांमुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल असे ते म्हणाले. या नवीन रस्त्यांच्या निर्मितीनंतर दिल्ली ते चंदीगडचे अंतर अडीच तासांनी कमी होईल, तसेच दिल्लीहून जयपूर, डेहराडून आणि हरिद्वारला दोन तासात पोहोचता येईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली आहे.