राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे

मुंबई : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम उत्साहात सुरु झाली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

तसेच लसीकरणासोबत आणखी एका गोष्टीसाठी आजचा दिवस हा दिलासा देणारा ठरला आहे. दररोजच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही आज घट झाली असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज २,९१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ५२ जणांचा मृत्यू झाला. तसेच ३,०३९ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत आढळून आलेल्या १९,८७,६७८ रुग्णांपैकी १८,८४,१२७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर एकूण ५०,३८८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर सध्या ५१,९६५ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७९ टक्के झाले आहेत.