नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही बहुमताने मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविषयी(Waqf Amendment Bill ) समाधान व्यक्त करत सोशल मिडियावर ट्विट केलं आहे.’सर्वसमावेशी राष्ट्रनिर्मिती’ असं ट्विट मोदींनी केलं. वक्फ सुधारणा विधेयक मंजुरी हा सामाजिक, आर्थिक न्याय, सर्वसमावेशी विकासामधील महत्त्वाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
मोदी पुढे लिहीतात की, या नवीन विधेयकामुळे ज्यांना वर्षानुवर्षे संधी नाकारली गेली होती अशा सर्वांना विकासाची संधी मिळेल. या वक्फ सुधारणा विधेयकाकरिता जे जे खासदार संसदीय चर्चांमध्ये सहभागी झाले होते. आणि ज्यांनी जेपीसीला याविषयी सुचना केल्या होत्या त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.आतापर्यंतच्या वक्फ प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव होता. त्यामुळे मुस्लिम महिला, गरिबांचं नुकसान झालं होतं. परंतु वक्फ सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केल्याने यात आता पारदर्शकता येईल. त्याचबरोबर लोकांच्या अधिकाराचंही रक्षण होईल. हे विधेयक म्हणजे सामाजिक न्यायासाठी संवेदनशील युगात पाऊल ठेवण्यासारखं आहे. यामुळे आता सर्वसमावेशी राष्ट्राची निर्मिती होईल.
वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत(Rajyasabha) सुमारे १२ तास चर्चा झाली. यावेळी, या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला. वक्फ सुधारणा विधेयक अन्याय करणारे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत आक्रमक भाषण केलं. त्यानंतर मध्यरात्री मतदान घेण्यात आलं आणि मध्यरात्री २.३० वाजता वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली तर विरोधात ९५ मते पडली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर हे विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.