दिल्ली हिंसाचारानंतर आशिष शेलारांचा पवार-राऊतांवर निशाणा; माथी भडकावण्याचं काम…
राजकारण

दिल्ली हिंसाचारानंतर आशिष शेलारांचा पवार-राऊतांवर निशाणा; माथी भडकावण्याचं काम…

मुंबई : रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेनंतर महाराष्ट्रातील भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ”हिंसाचार करणाऱ्यांविरोधात एक चकार शब्द काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडं आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलतान ते म्हणाले की, “या सर्व घटनेत जवान असो किंवा दिल्ली पोलीसांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का? आंदोलन चिघळलं होतं का? त्यामुळे माथी भडकावण्याचं काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही,” अशा शब्दात आशिष शेलारांनी  आपला संताप व्यक्त केला. तसेच, पोलिसांनी चौकशी जो दोषी असेल त्याला पकडावं. जो माथेफिरु असेल त्याच्या समर्थकांपर्यंतही पोहोचावं,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे शरद पवार आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावं. पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं, तलवारी काढणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे स्पष्ट करावं. या आंदोलनाला त्यांनी तीव्र रुप दिलं त्यांची चौकशी झाली पाहिजे पण ज्यांनी समर्थन दिलं त्यांचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी त्यांना हिंसाचारात काही भाजपाशी संबंधित लोकांची नावं समोर येत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “ज्यांचे स्वत:चे दामन रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करु नये. जे सत्य आहे ते देशाने पाहिलं आणि बाकीचं सत्य चौकशीत समोर येईल”. असंही त्यांनी म्हंटल आहे.