मुंडे भगिनींच्या नाराजीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया
राजकारण

मुंडे भगिनींच्या नाराजीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खा. प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं त्यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं?’ असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. या विस्तारात प्रीतम मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा होती. त्या दिल्लीला रवाना झाल्याचं वृत्तही आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘आमच्यापैकी कुणीही दिल्लीला गेलेलं नाही. आम्ही मुंबईतील निवासस्थानीच आहोत,’ असा खुलासा त्यांनी केला होता. शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्र्यांच्या अभिनंदनाचं ट्वीटही मुंडे भगिनींनी केलं नव्हतं. त्यामुळं त्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

नाशिक महापालिकेच्या बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस आज शहरात आले असता पत्रकारांनी नेमका त्यांना हाच प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं? त्या नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. पक्षातील निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात,’ असं ते म्हणाले. ‘नारायण राणे यांना मंत्री बनवताना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार केला गेला आहे. दुसरा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही,’ असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.