त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा
राजकारण

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातीन अनेक भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे याला बंदी घातली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत अशी परिस्थिती आहे. आता याच मुद्द्यावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोमाटणे टोल नाका राज ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिकांना मोफत झाला. यासाठी सर्व पक्षीय नेत्यांच एक शिष्टमंडळ राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. यावेळी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, ”माझा तर संशय आहे की, सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे फार्मास्यूटिकल कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना? कारण कोरोना काळात मोठ्या प्रमाणात औषधं निर्माण करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साईड्स इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे विचार नाही ना? आशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय चांगल्यासाठीच घेतला असेल. माझी फक्त त्यांना एवढीच विनंती आहे की, ही बाब फक्त महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप यांना देखील सांगा. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात तर दुसरीकडे भाई जगताप लॉग मार्च काढतात. यावेळी कोरोना पसरत नाही का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचेच मंत्री सध्या पॉझिटिव्ह येत आहेत, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, , “आशा प्रकारची कारणं चुकीची आहेत. अधिवेशन व्हायला हवं. हे बजेटरी अधिवेशन आहे. आधीच सरकार बोंबा मारत आहे आमच्या तिजोरीत काहीच नाही. खडखडाट आहे. त्यामुळे अधिवेशन व्हायला हवं. सध्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने टॅक्स कमी करायला हवेत. इतर राज्यात राज्य सरकार टॅक्स कमी करू शकतं तर आपलं राज्य सरकार का नाही करू शकत? तरच पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील.”

तसेच सामनात लिहिलेल्या ‘चंदा गोळा करण्यापेक्षा पेट्रोल डिझेलचे दर कमी करा’ या प्रश्नाला उत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला टोला मारताना म्हणाले की, “हिंदुत्वापासून बाजूला गेल्यामुळे त्यांची ती भावना झाली असेल. श्री राम प्रभूंवर आमची नितांत श्रद्धा आहे. एक एक रुपया द्यायला लागला तरी आम्ही तयार आहोत आणि दुसरी बाब मनमोहन सिंग असताना 121 रुपये पर बॅलर दर होता आता 63 रुपये आहे. त्यामुळे केंद्राने आणि राज्य सरकारने टॅक्स कमी करावा. केंद्र सरकार करेल तेव्हा करेल राज्य सरकारने करायलाच पाहिजे. हे सापनाथ आणि दुसरे नागनाथ हे असेच आहेत.”