वाळवणे गावचा कारभार पतीपत्नीच्या हाती; पत्नी सरपंच तर पती उपसरपंच
राजकारण

वाळवणे गावचा कारभार पतीपत्नीच्या हाती; पत्नी सरपंच तर पती उपसरपंच

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील वाळवणे गावाचा कारभार पती-पत्नीच्या हातात सोपवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महिला आरक्षण असल्याने जयश्री पठारे यांची सरपंचपदी तर जयश्री यांचे पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात असलेले वाळवणे गाव. 2000 लोकसंख्या असलेल्या वाळवणे गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. गावात एकूण नऊ जागा होत्या, त्यापैकी चार जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित जागांसाठी निवडणूक झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण असल्याने जयश्री पठारे यांची सरपंचपदी तर त्यांचे पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. सचिन पठारे आणि त्यांची पत्नी जयश्री पठारे यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि दोघांचीही बिनविरोध निवड झाली. त्यानंतर वाळवणे ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण आले. सचिन पठारे यांनी दहा वर्षे गावात सामाजिक कार्य केले. त्याचीच पावती म्हणून गावकऱ्यांनी गावाचा कारभार सचिन पठारे आणि जयश्री पठारे या पती-पत्नीच्या हातात सोपवला.

तर, पत्नी सरपंच आणि ग्रामस्थांच्या आग्रहामुळे सचिन पठारे यांनी देखील पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यातच स्वतः उपसरपंच झाल्याने गावाचा चांगला विकास करणार असल्याचे सचिन पठारे यांनी सांगितले. इतकेच नाही तर “पत्नी सरपंच आल्याने सर्व निर्णय घेण्याचा अधिकर हा पत्नीलाच असणार आहे, आणि जर विकासकाम करताना काही मदत लागली तर पती आणि उपसरपंच या दोन्ही नात्याने मदत करणार” असं सचिन पठारे यांनी सांगितलं.

जयश्री यांच्या लग्नाला 13 वर्षे झाली आहेत. जयश्री यांचे वडीलही सामाजिक कामात अग्रेसर आहेत. तोच वारसा जयश्री यांनी देखील जपला. लग्न झाल्यानंतर घरकाम करता करता सामाजिक काम करण्याची जयश्री यांची इच्छा होती. त्यामुळे पहिल्यांदाच जयश्री यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली. त्यातच महिला आरक्षण आल्याने ग्रामस्थांनी एकमताने जयश्री यांची सरपंचपदी निवड केली. सरपंचपद मिळल्याने गावाचा विकास करण्याची संधी मिळाली असून महिला सक्षमीकरणाबरोबर गावाचा विकास करणार असल्याचा विश्वास नवीन सरपंच झालेल्या जयश्री यांनी व्यक्त केला.