केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे
राजकारण

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे

मुंबई : ”केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे अनेक प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या निर्धार बोलून दाखवला होता. पण राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून केंद्रानेच हा दर्जा दिलेला नाही, असा आरोप केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करताना ते बोलत होते.“मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषा दिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे?, आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखीन काही लागल्या तर त्याही देऊ. मात्र अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभूमिला तिष्ठत उभं ठेवलं आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

इतकेच नव्हे तर, मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत? छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नाही,” असं म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं समर्थन केलं. दिल्लीत जे बसलेत ते तरी असते का हा पहिला विचार केला पाहिजे आणि ज्या भाषेमुळे आपलं अस्तीत्व आहे, त्या भाषेला तुम्ही तिचा मान द्यायला नाकारात आहात हा करंटेपणा महाराष्ट्र कदापी विसरु शकत नाही. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, “तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ते पहिलं हिंदुत्व राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींची ही मातृभाषा आहे. तिच माझी आणि तुमची मातृभाषा आहे. तसेच छत्रपती नसते तर तुमचं आमचं सोडून द्या. मराठी माती आणि मराठी माता हे विसरु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न अडकून आल्याचा आरोप केला.