‘ती’ केस पुन्हा ओपन झाली तर नितेश राणे तुरुंगात जातील; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट
राजकारण

‘ती’ केस पुन्हा ओपन झाली तर नितेश राणे तुरुंगात जातील; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. असा खळबळजनक दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्यानं आरोप प्रत्यारोप झडताना बघायला मिळतात. त्यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल आस दावा केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले,”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

विनायक राऊत पुढे म्हणाले की, ” नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला फडणवीसांनी परवानगी द्यावी म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. मात्र उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा,” असा राजकीय सल्ला राऊत यांनी यावेळी दिला.

दरम्यान, या राऊत यांच्या या आरोपांवर नितेश राणे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता नितेश राणे नेमकं काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे नितेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.