ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर  निशाणा
राजकारण

ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर निशाणा

मुंबई : ”राज्याच्या गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, त्यामुळं सरकारनं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सचिन वझे प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवण्याची मागणी केली. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण ह्या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल ह्याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ.

जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत. ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊ द्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या, असं ते म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, असं राज ठाकरे म्हंटल आहे.

त्याचबरोबर, मुळात मुकेश अंबानींच्या घराच्याबाहेर बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? पोलिसांनी बॉम्ब ठेवले ही साधी गोष्ट नाही. इतकच नव्हे तर, परमबीर सिंह ह्यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? असा सवाल देखील त्यांनी केला.